कडेगाव (सातारा) : ‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि ही लोकशाही बळकट करण्याचे काम मतदार करत असतात. मतदानाचा हक्क हा एक पवित्र अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे,’ असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी केले. भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या शासनाच्या मतदार नोंदणी अभियानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
‘सर्वांनी मतदार नोंदणी करून, हे अभियान यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.
मतदानाचा हक्क किती महत्त्वाचा आहे याची जाणीव महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुलक्षणा कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना करून दिली. ‘महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणी व मतदान जागृतीविषयी नेहमीच कार्यक्रम आयोजित केले जातात,’ असे सांगून महाविद्यालयाच्या वतीने हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे वचन त्यांनी दिले.
‘मतदार नोंदणी अभियान व मतदान जागृती’ या विषयावर महाविद्यालयाने निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला सांगलीचे उपजिल्हाधिकारी मिनार मुल्ला, कडेगाव तालुक्याच्या तहसीलदार अर्चना थेटे, कडेगाव तालुक्याचे युवा नेते डॉ. जिनेध कदम, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. भरत पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन उपप्राचार्य प्रा. मधुकर खोत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रंजना चव्हाण यांनी केले.